परंपरागत शेतीतून हमखास उत्पन्न मिळत नसल्याने अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडतात. मात्र, त्यातून मार्ग शोधत, यशाची नवी वाट चोखाळणारे शेतकरीही कमी नाहीत. अशाच एका प्रेरणादायी यशकथेचा नायक म्हणजे बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील खिळद गावातील विठ्ठल शंकर गर्जे. शिक्षण नसतानाही, अंगठा बहाद्दर विठ्ठलरावांनी सोशल मीडियाचा आधार घेत हिमाचलच्या सफरचंदासारखे थंड हवामानात येणारे पीक मराठवाड्याच्या कोरडवाहू जमिनीत यशस्वीरित्या उगमास आणले आहे.
विठ्ठलराव गर्जे यांचे शिक्षण फारसे झालेले नाही. त्यांनी काही वर्षे खाजगी वाहन चालक म्हणून काम केले. त्या काळात मिळणाऱ्या उत्पन्नातून त्यांनी आपल्या मुलांचे शिक्षण पूर्ण केले. त्यांची दोन्ही मुले आज इंजिनिअर आहेत. मुलांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर गावी परतल्यानंतर शेतीमध्ये काहीतरी वेगळं करायचं, असं त्यांनी ठरवलं. पारंपरिक शेतीत नफा न मिळाल्याने त्यांनी इंटरनेटचा आधार घेत युट्यूबवरून आधुनिक शेतीविषयक माहिती मिळवायला सुरुवात केली. त्यात त्यांना सफरचंद शेतीबाबत माहिती मिळाली आणि तिथूनच सुरू झाली एका नव्या प्रयोगाची प्रेरणादायक वाटचाल.
विठ्ठलरावांनी हिमाचल प्रदेशातून थेट सफरचंदाची रोपे मागवली. तीन वर्षांपूर्वी त्यांनी २० गुंठ्यांत १० बाय १० फुटांवर ही रोपे लावली. पाण्यासाठी ठिबक सिंचन यंत्रणा बसवली, योग्य खत व्यवस्थापन आणि वेळोवेळी फवारणी केली. या संपूर्ण प्रक्रियेत त्यांचा खर्च सुमारे ५० हजार रुपये झाला. या वर्षी या झाडांना पहिल्यांदाच फळे लागली असून लवकरच ती बाजारात विक्रीसाठी जाणार आहेत. अपेक्षित बाजारभाव मिळाल्यास त्यांना अंदाजे दीड लाख रुपयांचे उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे.