Rain Update:- सध्या महाराष्ट्रात मॉन्सूनच्या आगमनाबाबत एक प्रकारची अनिश्चितता आणि असमाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. मे महिन्याच्या अखेरीस आणि जूनच्या पहिल्या काही दिवसांत राज्यात मान्सूनपूर्व पावसामुळे थोडाफार दिलासा मिळालेला असला, तरी खरीखुरी मॉन्सून हजेरी अद्याप लागलेली नाही. हवामान विभागाच्या माहितीनुसार, मॉन्सूनचे वारे सध्या मंदावले असून, त्याच्या प्रगतीस पोषक वातावरण तयार होत नसल्याने राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता सध्या तरी नाही.
राज्यातील बहुतांश भागांत, विशेषतः मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र भागात, जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून उष्णतेची तीव्रता वाढलेली आहे. काही भागांत कमाल तापमान ४२ ते ४५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले असून, यामुळे उन्हाचा प्रचंड त्रास जाणवत आहे. पावसाचे लक्षणे असूनही, त्याचे प्रमाण अत्यंत अल्प आणि विखुरलेले आहे. याचा फटका थेट शेतकऱ्यांना बसतो आहे, विशेषतः कोरडवाहू शेती करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे.