Monsoon 2025:- राज्यात गेले काही दिवस शांत झालेला मान्सून आता पुन्हा एकदा सक्रिय होणार आहे. भारतीय हवामान विभागाने याबाबत महत्त्वाची माहिती दिली असून, १२ जूनपासून महाराष्ट्रात पुन्हा पावसाळी हवामानाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात काही भागांमध्ये हलका पाऊस झाला असला तरी, बहुतांश भागांत पावसाने फारशी हजेरी लावली नव्हती. मात्र आता पुन्हा हवामानात बदल होऊन, पावसाच्या सरी राज्यभर कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, हवामान विभागाने राज्यातील १३ जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला असून, शेतकरी वर्ग आणि सामान्य नागरिकांनी योग्य ती तयारी ठेवावी, असा सल्ला देण्यात आला आहे.
गुरुवार, दिनांक १२ जूनपासून सुरू होणारा हा मान्सून सक्रियतेचा कालावधी पुढील पाच दिवस म्हणजे १६ जूनपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. विशेषतः १४ ते १६ जूनदरम्यान, मुंबई, कोकण, खान्देश, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या भागांमध्ये जोरदार सरींची शक्यता वर्तवली आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे, त्यामुळे नागरिकांनी काळजीपूर्वक वागावे आणि अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे, असा सल्ला देण्यात आला आहे.