ऑपरेशन सिंदूर’च्या निमित्ताने देशभरात एका विशेष वनस्पतीची आणि एका बुद्धिमान शेतकऱ्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. ही वनस्पती म्हणजे ‘सिंदूर वनस्पती’ आणि शेतकरी म्हणजे उत्तर प्रदेशातील आग्रा जिल्ह्यातल्या बाह ब्लॉकमधील वैरी गावचे रामधनुष त्यागी. त्यांनी सिंदूर वनस्पतीची शेती करून केवळ स्वतःसाठी नव्हे, तर अनेक शेतकऱ्यांसाठी नव्या संधींचं दार खुलं केलं आहे. पारंपरिक पिके घेताना मिळणाऱ्या कमी नफ्याच्या तुलनेत सिंदूर वनस्पतीनं त्यांना आश्चर्यकारक उत्पन्न मिळवून दिलं आहे.
रामधनुष यांना दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्रातून फक्त तीन सिंदूरची रोपं मिळाली, ज्याची किंमत होती १८० रुपये प्रति रोप. सुरुवातीला त्यातल्या दोन रोपांचा नाश झाला, पण एक रोप मात्र जगलं. ह्याच एका रोपातून त्यांनी तब्बल १ किलो बियाणे मिळवलं – आणि या बियाण्याला बाजारात १०,००० रुपये प्रति किलो भाव मिळाला! म्हणजे अगदी छोट्या प्रमाणावरही घेतलेल्या या शेतीतून त्यांना मोठा नफा मिळाला.