Maharashtra Havaman:- सध्या राज्यात मान्सूनच्या संदर्भात एक चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे. ऐन मे महिन्याच्या अखेरीस झालेल्या अवकाळी आणि मॉन्सूनपूर्व पावसाने राज्यात मोठा गोंधळ उडवला होता. अनेक भागांत मुसळधार पावसाने शहरांतील पावसाळी तयारीवर पाणी फिरवले, तर कोकण भागात आंबा उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसला. मात्र, जून महिन्याच्या सुरुवातीलाच अपेक्षित असलेला मुख्य मोसमी पाऊस म्हणजेच नैऋत्य मान्सून राज्यात वेळेवर दाखल न होता रखडलेला आहे. हवामान विभागाने स्पष्ट केले आहे की, जो पाऊस सध्या काही भागांत कोसळतो आहे तो मान्सूनचा भाग नाही. तो फक्त मेघगर्जनेसह होणारा व बाष्पयुक्त वातावरणामुळे निर्माण झालेला अस्थायी पाऊस आहे.
१५ जूनपर्यंत पावसाची स्थिती कशी राहील ?
हवामान विभागाने दिलेल्या माहितीप्रमाणे, किमान १५ जूनपर्यंत राज्यात पावसाचे प्रमाण विखुरलेले राहणार आहे. म्हणजेच काही भागांत थोड्या सरी पडू शकतात, पण संपूर्ण राज्यभर सर्वदूर व नियमित पाऊस अपेक्षित नाही. त्यामुळे शेतकरी, विशेषतः कोरडवाहू भागातील शेतकरी, यांनी अजून काही काळ पेरणीच्या कामांपासून थोडेसे थांबावे, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. पाऊस न झाल्यास पेरण्या अयशस्वी होण्याचा धोका असल्यामुळे शेतकऱ्यांनी शहाणपणाने निर्णय घ्यावा लागेल.