नादच खुळा! संत्रा शेतीत दोन भावंडांचा चमत्कार; एका हंगामात मिळवले २२ लाखांचे उत्पन्न

संत्रा उत्पादनामध्ये यशस्वी ठरलेली ही दोन भावंडांची कहाणी केवळ शेतीतील प्रगती नव्हे, तर आधुनिक तंत्रज्ञान, शिक्षण आणि परिश्रमाच्या योग्य संयोगाचे जिवंत उदाहरण आहे. अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील पुसला या गावातील मांडळे कुटुंबातील पंकज आणि स्वप्नील या भावंडांनी पारंपरिक शेतीच्या पलीकडे जाऊन वैज्ञानिक पद्धतीने संत्रा उत्पादनात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. सातपुडा पर्वतरांगांच्या पायथ्याशी वसलेला हा प्रदेश विशेषतः संत्र्याच्या चव आणि गुणवत्तेसाठी प्रसिद्ध आहे. याच भूगोलिक परिस्थितीचा लाभ घेत, त्यांनी संत्र्याच्या आंबिया आणि मृग या दोन्ही बहरांचे नियोजनपूर्वक उत्पादन घेतले.

स्वप्नील मांडळे हे बी.ए.बी.एड. तसेच कृषी पदवीधर असून, नोकरीच्या संधी असतानाही त्यांनी शेतीला प्राधान्य दिले. त्यांचे वडील शिक्षक होते, तर आई शाळेच्या मुख्याध्यापिका होत्या, त्यामुळे घरात शिक्षणाचा वारसा होता. मात्र, त्यांनी शिक्षणासोबतच शेतीचा वारसा जपला. त्यांच्या बागेत १५, १२ आणि ७ वर्षांची झाडे असून, या झाडांची देखभाल अत्यंत काटेकोर पद्धतीने केली जाते. सिंचनासाठी त्यांनी वाफे व ठिबक सिंचन या दोन्ही पद्धतींचा वापर केला असून, वाफे पद्धतीने पाणी देताना झाडाच्या बुंध्याला पाणी लागू नये यासाठी त्यांनी झाडाभोवती ‘गोंगोली’ केली आहे.

फळझाडांवर रोग व कीड नियंत्रणासाठी बोर्डोपेस्टचा वापर केला जातो. त्यामुळे बुरशीजन्य रोग व खोडकिडींचा प्रादुर्भाव कमी होतो. खत व्यवस्थापन आणि पाणी नियोजन हे अत्यंत वैज्ञानिक पद्धतीने केले जात असल्याने संत्र्याचा दर्जा टिकवून ठेवण्यात आणि उत्पादन वाढवण्यात त्यांना यश आले आहे. विशेष म्हणजे, मृग बहरामधील संत्र्याची फळे घेणे म्हणजे बागेच्या आरोग्यावर परिणाम होतो, असा पारंपरिक समज असतानाही त्यांनी तो खोडून काढला आहे. योग्य व्यवस्थापनाने मृग बहरातही बाग निरोगी ठेवता येते, हे त्यांनी सिद्ध केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *