खरीप हंगाम संकटात? पेरणी सुरू होण्याआधीच बियाणं-खताचा तुटवडा

खरीप हंगाम अगदी उंबरठ्यावर असताना अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांपुढे बियाणे आणि खतांची टंचाई ही मोठी अडचण बनून उभी राहिली आहे. विशेषतः कपाशीच्या विशिष्ट वाणाचे बियाणे आणि डीएपी (DAP) खताचा साठा अत्यंत मर्यादित असल्याने वेळेवर पेरणी होईल की नाही, यावरच शंका निर्माण झाली आहे. हवामान अनुकूल असून पेरणीस योग्य पाऊसही पडला आहे, मात्र आवश्यक इनपुट्सच उपलब्ध नसल्याने शेतकरी संभ्रमावस्थेत आहेत.

कृषी विभागाने यंदा कपाशीच्या विशिष्ट वाणासाठी तब्बल तीन लाख बियाण्याच्या पाकिटांची मागणी नोंदवली आहे. मात्र ५ जूनपर्यंत केवळ १ लाख १२ हजार पाकिटेच उपलब्ध झाली असून सध्यास्थितीत केवळ एक हजार पाकिटेच साठ्यात असल्याची माहिती आहे. ही परिस्थिती गंभीर असून पुढील काही दिवसांतही जर पुरवठा नीट झाला नाही, तर जिल्ह्यात बियाण्याचा मोठा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

खतांच्या बाबतीतही चित्र तितकेच चिंताजनक आहे. डीएपी खताची २५ हजार मेट्रिक टन मागणी असताना आतापर्यंत केवळ ५ हजार मेट्रिक टनाचा पुरवठा करण्यात आला आहे. सध्यस्थितीत जिल्ह्यात केवळ १,१०० मेट्रिक टन डीएपी खत उपलब्ध आहे. हे प्रमाण खरीप पेरणीच्या मागणीच्या तुलनेत अत्यल्प आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *